उपजीविका नव्हे आजीविका ...
एकदा का एखाद्या गोष्टीबद्दलची आवड व्यक्तीच्या रोमारोमांत भिनली कि, मग त्याला मागे वळून बघण्याची गरज उरत नाही. गरज उरते फक्त ही आवड समोर ठेवून निरंतर वाटचाल करण्याची ... आपल्या कामाविषयी असणारी कमालीची आवड आपली आजीविका बनू शकते. ही आजीविकाच व्यक्तीला स्वतंत्र बनविते. फक्त ध्येय मिळविणे त्याचे उद्देश्य राहत नाही. किंबहुना व्यक्ती नकळत ध्येयापलीकडे वाटचाल करू लागतो. ही वाटचाल त्याला थकवत नाही, उलट त्याला आणखी शक्ती देते. ही शक्ती व्यक्तीला जगण्यापलीकडचा जीवनाचा अर्थ समजाविते. यातून जे जन्मतं, ते असाधारण व्यक्तित्व असतं. एक असं व्यक्तित्व, कि ज्याची तुलना होऊ शकत नाही. ते काहीसं अविश्वसनीय असतं, एक असं व्यक्तित्व जे स्वयंभू असतं, ज्याला स्वतःचं अस्तित्व सार्थकी लावून सिद्ध करता येतं. आणि मग एखादी गोष्ट व्यक्तीची 'आजीविका' बनल्यास त्याच्या 'उपजीविके'चा प्रश्न उरत नाही. पंचभूते म्हणा, निसर्ग म्हणा, जगनिर्मिती करणारी ती जी एक शक्ती आहे, ती हर एक मार्गाने त्या व्यक्तीचा उद्धार करते. ती व्यक्ती आता सामान्य राहत नाही. तर वैश्विक प्रकाशाची एक किरण त्याला उज्ज्वाल्य बहाल करते. ही सृष्टी जणू त्याच्यावर पुष्पवर्षाव करते. ती स्वतः त्या व्यक्तीला जणू दत्तक घेते. वेगवेगळ्या माध्यमांतून या व्यक्तीचा विकास होतो. हा विकास फक्त भौतिक नसतो. शिवाय क्षणिक नसतो. तो निर्वाद चिरंतन सुखाची अनुभूती देणारा असतो. ज्याची किंमत भौतिक पटलावरील क्षणभंगुर सुखापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. जग बदलण्याची धमक आहे. तेजपुंज असा ज्याचा चेहरा आहे. ज्याचा व्याप महासागरापेक्षा विस्तृत आहे. ज्याची उंची गिरिशिखरांपेक्षा जास्त आहे.
यानंतर जन्म होतो 'चित्तशुद्धीचा'. जी व्यक्ती आजीविका बनवून त्याद्वारे स्वतःला व समाजाला स्थिर करते, ती अश्याच प्रयत्नांनी जलद गतीने 'चित्तशुद्धी' होण्याकडे वाटचाल करत असते. एकदा का चित्तशुद्धी झाली की मग व्यक्तीला जीवनाच्या अंताचीही भिती उरत नाही. ती तिच्या कर्तृत्वाद्वारे समाज दीपमय बनवून केव्हाही या शरीरमयी मायेतून प्रस्थान होण्यासाठी तयार असते. ज्याला आपण मुक्ती असे म्हणतो,
महात्मा फुले यांनी म्हटलेले आहेच,
"ही माझी आजीविका आहे, उपजीविका नव्हे."