एक गंभीर समस्या ...
खरे म्हणजे मानवी अधिकारांची पायमल्लीचं होतांना दिवसेंदिवस दिसत आहे. ज्या क्रूर नराधमांना मानवतेच्या नावाखाली आधार दिला जातो, मुळात ते मानव राहिले आहेत का ? हाच एक ज्वलंत प्रश्न आहे. एखाद्या असहाय्य जीवाला क्षणिक स्व-स्वार्थासाठी अमानुष पद्धतीने उध्वस्त करून सोडणे, हे माणुसकीत तर मुळीच बसत नाही. आणि जर ह्याच पापी लोकांना माणुसकीच्या, मानवतेच्या, मानवाधिकाराच्या मिथ्या कारणांमुळे सोडले, तर माणूसकीला काय अर्थ राहिला ?
इतरांवर अत्याचार करणाऱ्यांसाठी सहानुभूती हा खरा न्याय ठरतो का ? मानवाधिकार माणसासाठी असतात. खुले, अक्षम्य अपराध करणारे या व्याख्येत बसत नाहीत. त्यांना सहानुभूती दर्शविणे हा माणुसकीचा अपमान आहे. कारण मानवाधिकार हि कोणा एकाची मक्तेदारी नाही. जो मानवाधिकार या भिकारड्या तत्त्वाच्या नराधमांना आहे, तो त्या निष्पाप, निष्कारण बळी गेलेल्या कळीलासुध्दा तितकाच आहे. त्या नराधमांना मोकळं सोडण्याआधी त्याला तिच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली करण्याचा 'मानवाधिकार' कोणी दिला, यावर एकदा तरी विचार व्हायलाच हवा.
आज इतक्या प्रमाणात अमानुष कृत्ये होऊनही अशा नराधमांना हसण्यायोग्य शिक्षा होत आहेत. बाकीच्या देशांत जर आपण बघितले, तर याच्या विरुद्ध स्थिती दिसेल. गंभीर आरोपासाठी गंभीर शिक्षा ही काळाची गरज आहे.
अयोग्य ठिकाणी यामुळे प्रश्न निर्माण होतील, असा एक आवाज याविरुद्ध उभा राहतो. पण कमीत कमी आजच्या घटना बघता, इतक्या विदारक स्थितीमध्ये तरी कायद्याचे सोंग या ढोंग न करता, स्त्रियांच्या मनात फक्त भीती जन्माला येण्याआधी तरी या पापींना मरण द्यायलाच पाहिजे.
अजूनही जर आपण सुधारलो नाही, तर यापेक्षा अत्त्युच दर्जाची निर्ल्लज, विकृत मनोवृतीच्या परिणामांसाठी तयार राहणे, हाच एक उपाय राहिलं.
शेवटी विचार आपलाच आहे, किती 'निर्भयांनी' या भयाला सामोरे जावे व भीतीलाही लाजवेल अशा पद्धतीने मरणाला शरण जावे, यावर विचारविमर्श व्हावाचं.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे 'निर्भया' ठेवूनही 'भय इथले संपत नाही' ही स्थिती सुधारणार नाही. या मिथ्या क्षणिक मन हलकं करणाऱ्यासाठीच्या उपायांपेक्षा एक शेवटचा उपाय आता काढायलाच हवा.
शेवटी ...
'मानवाधिकार आहे म्हणून
माणसाने माणुसकीचा तमाशा करू नये,
लाजेलाही लाजवेल अशी कृती,
समाजात घडवू नये ... '